Saturday 5 January 2019


Below is the post by Dr. Maya Bhalerao, from Pune, who participated in 2018 Plastic Surgery camp at MAHAN Melghat.


हो...ते तर मेळघाटातील देवदूतच !!
                                                                   © डॉ माया भालेराव


     मनुष्य सतत आनंदाच्या शोधात असतो. त्यासाठी कधी कधी देशविदेशाची सहल करतो. डोंगरदऱ्यातून साहसी सफर करतो. मनोरंजन म्हणून नाटकं -सिनेमे बघतो. छान कपडे घालून मिरवतो. आपल्या आनंदी आयुष्याच्या सर्वसामान्य व्याख्या करतो. आपण मौजमजेतच धन्यता मानतो. पण ह्या सर्व गोष्टीपासून काही लोक वंचित आहे. ज्यांना रोजच्या पोटभर जेवणाची भ्रांत आहे. ज्यांचा रस्ता आरोग्याच्या सेवेपासून कोसभर दूर आहे, ज्यांना थंडी वाऱ्यापासून संरक्षण होईल इतके पुरेसे कपडे सुद्धा नाहीत. त्यांच्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने काय करत असतो ?? मी लिहितेय...महाराष्ट्रातील दुर्गम भाग - मेळघाटातील आदिवासी लोकांबद्दल !
   
     हो, या वंचित लोकांसाठी झटणारे काही मायबाप आहेत. त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणारी ही थोर मंडळी म्हणजे कधी ते बाबा आमटे, डॉ प्रकाश- डॉ मंदा आमटे असतात...नाहीतर ते डॉ रवींद्र- डॉ स्मिता कोल्हे असतात... कधी ते डॉ अभय- डॉ राणी बंग असतात... आणि कधी ते डॉ आशिष- डॉ कविता सातव असतात. ही देवमाणसं कुठेही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न येता अविरत कल्याणकारी कामे करत असतात.
   
       अश्या महान लोकांपैकी एका जोडप्याला भेटण्याचं भाग्य मला लाभलं. महात्मा गांधीजींच्या आणि विनोबा भावेंच्या विचारांनी भारावलेले हे तरुण डॉक्टर म्हणजे डॉ आशिष- डॉ कविता सातव. ‘India Lives in villages’   म्हणत लग्नानंतर “महान चॅरिटेबल ट्रस्ट फॉर ट्रायबल पिपल” ची स्थापना केली. गेल्या २० वर्षापासून आशिष- कविता मेळघाटातील आदिवासी लोकंसाठी जीवाभावाने सेवा देत आहेत. रोजच्या विनामूल्य तपासणी व्यतिरिक्त अनेक आरोग्याच्या योजना ते राबवितात. अनेक कॅम्प्स घेतात. सर्जरी करतात. त्यांनी उभारलेल्या जंगलातल्या झोपडीत बनविलेल्या आयसीयू पासून तर आता अद्यावत आयसीयू आणि ऑपरेशन थियेटरचा प्रवास अतिशय कष्टदायी आहे. थरारक आहे. वाखाणण्यासारखा आहे.
 
      २१ ते २५ डिसेंबर दरम्यान त्यांनी आयोजित केलेल्या प्लास्टिक सर्जरीच्या कॅम्पला जाण्याचा मला योग आला. प्लास्टिक सर्जरीच्या या कॅम्प मध्ये जन्मजात व्यंग असलेले, ओठ दुभंगलेले, हातापायाची चिकटलेली बोटे, भाजल्यामुळे आकुंचन पावलेली कातडी –स्नायू, कॅन्सरच्या गाठी असे बरेच रुग्ण होते. त्यासाठी ऑस्ट्रेलियावरून एक भला माणूस डॉ. दिलीप गवाणकरी जे प्लास्टिक सर्जन आहेत, दरवर्षी आपल्या मायदेशाबद्दल कृतज्ञता खातर येत असतात आणि विनामूल्य उपचार करून येथील अनेकांना सुंदर–सुकर-सुसह्य आयुष्य देवून जातात.

     आपल्या शहरी वातावरण अंगवळणी पडलेल्या शरीराच्या मनात असंख्य प्रश्न पिंगा घालू शकतात ! तेथे जेवण कसे असेल ? राहायची व्यवस्था कशी असेल ...आंघोळीला, प्यायला पाणी असेल न ? पण अपेक्षा ठेवल्या नाही तर नाराज व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तेच केले. कसेही असले तरी जुळूवुन घ्यायची माझी तयारी होती. अश्या शंका, प्रश्न बाजूला ठेवून २१ डिसेंबरला मी पुण्याहून मेळघाटात पोहचले.
   
      डॉ आशिष आणि कविता यांनी आधीच १२० पेशंट सर्जरी साठी तयार करून ठेवले होते. डॉ प्रशांत गहुकर यांनी  त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करून दिल्या. इसीजी,एक्स रे सुद्धा तयार होते. तेथे पोहोचल्याबरोबर लगेचच तासाभरात फ्रेश होऊन सर्जन डॉ. दिलीप यांनी सर्जरीच्या दृष्टीने व मी भूल देण्याच्या दृष्टीने हे सर्व पेशंट सकाळी पासून तर रात्री पर्यंत बघितले. त्यानंतर ऑपरेशनची लिस्ट तयार केली. कोणाला आधी, कोणाला कसे करायचे, किती वेळ लागणार, भूल कोणत्या प्रकारची द्यावी लागणार असे सगळे नियोजन केले.
   
       डॉ दिलीप यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियाहून नर्स मिस बेथेलीया आणि  फीजीओथेरपिस्ट मिस  जौडी या मोठ्या उत्साहाने आल्या होत्या. डॉ कविता ऑपरेशनसाठीची अनेक अवजारे, औषधे, इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या, कपडे याच्या गराड्यात बसून दुसऱ्या दिवशीच्या तयारीत मग्न होती.
   
     एकावेळी ५ ऑपरेशन टेबल वर ऑपरेशन सुरु करायचे होते. मी सकाळी लवकर जाऊन ओटी मध्ये तयारी केली. भुलीची औषधे, यंत्रणा सज्ज ठेवली. जेणेकरून रुग्णांना एकापाठोपाठ सर्जरीसाठी घेता येईल. बाहेर ६.४ अंश  कडाक्याच्या थंडीत ऑपरेशन करून घेण्यासाठी गाव जमा झाला होता. सकाळीच रुग्ण उपाशीपोटी रांगा लावून तयार होते .
       
       सर्व तयारी झाल्यावर ९ वाजता पहिला पेशंट आत घेतला. टीम चे नाव नमूद करायलाच हवे. डॉ आशिष आणि सहकारी ओटी बाहेरील व्यवस्था सांभाळत होते. ऑपरेशन थियेटरमध्ये डॉ कविता अतिशय शिस्तबद्ध रितीने  पेशंट ची ने-आण करणे, सिस्टर, वॉर्ड बॉयला सूचना देणे, आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून देणे, जमल्यास छोटी ऑपरेशन करणे असा मल्टीपर्पज रोल लीलया करत होती.
   
         माझ्यासह अजून काही भूलतज्ञ डॉ अंजली कोल्हे, डॉ सचिन पावस्कर, डॉ शरयू मुळे आणि ऑस्ट्रेलिया वरून आलेले भूलतज्ञ डॉ हेल्गे, आम्ही भूल देण्याची जबाबदारी सांभाळत होतो. सर्जरीसाठी प्लास्टिक सर्जन डॉ. टावरी, डॉ मेहता, डॉ रवी अशी सर्जन मंडळी तैनात होती. अनेक सिस्टर- वॉर्ड बॉय आपापली कामे चपळाईने करत होते. एकंदरीत सर्व माहोल उर्जा आणि उत्साहाने झपाटल्यागत झाला होता. पहिल्या दिवशी सकाळी जो सर्जरी करण्याचा सपाटा सुरु झाला तो रात्री १०.३० वाजता ५६ ऑपरेशन करून आम्ही बाहेर पडलो. त्यात जेवण आणि दोन वेळेचा चहा सोडला तर मध्ये ब्रेक नव्हता!
       
        दुसरा दिवस सुद्धा तसाच ! १००-१२० सर्जरी प्लान केल्या होत्या. ऑपरेशन थियेटर मध्ये कामात टीम वर्क आणि नियोजन असल्याने सर्जरी करायला वेग होता. अद्ययावत अवजारे –निर्जंतुकीकरण करण्याची सामग्री- असल्याने योग्य- न्याय सुविधा देता येत होत्या. ३-४ भूलतज्ञ असल्याने रुग्णाची सुरक्षितता ध्यानात होती. कुठेही गडबड- गोंधळ -हलगर्जी पणा नव्हता.
    विशेष म्हणजे डॉ आशिष आणि कविता यांचे झंझावातासारखे काम आणि आदिवासी रुग्णांचा यांच्या दोघांवरचा विश्वास सगळं कसं आनंद देणारं होतं. मनस्वी समाधान देणारा डोंगर मी हळूहळू चढत होते.
     तिसऱ्या दिवशी माझी परत निघायची वेळ आली. डॉ सातव यांच्या सहकाऱ्याने मला जाता जाता राहण्याच्या खाण्यापिण्याच्या सोयी कश्या होत्या याबाबत फीड बॅक फॉर्म भरायला दिला.

 मी काय लिहिणार त्यावर ? सुविधा एवरेज कि गुड? कि व्हेरी गुड किंवा नॉट गुड ? माझे हात अडकले. अरे काय हे ? त्या तर इतक्या एक्सलंट होत्या कि ज्याला कागदावरच्या कॉलमच्या साच्यात बसविणे म्हणजे त्या सन्माननीय जोडप्याच्या कामाचा अपमान होता. इतक्या दुर्गम भागात सोयी सुविधांना कॅटेगरीची खरंच गरजच नाही . माझ्या दृष्टीने त्या अति उच्च दर्जाच्या  होत्या.

   सकाळ संध्याकाळ गरमागरम, चविष्ट नास्ता, जेवण...राहण्याची आणि आंघोळीची सोय आणि या ही पेक्षा त्यांचे आदरतिथ्य, आतिथ्यशीलपणा आणि साधेपणा हा खूप खूप जास्त अनमोल होता.

    माझे तर सोडाच ! ज्या सुविधा, आरोग्यसेवा ही दोघे गेली कित्येक वर्षे आदिवासींना विनामूल्य देत आहेत तिथे माझ्या दोन दिवसाच्या सुविधेचे काय ? मी तर कोणत्याच अपेक्षेने गेले नव्हते. गेले होते अल्पसे योगदान द्यायला पण त्याही पेक्षा कितीतरी जास्त आनंद घेवून बाहेर पडत होते. कारण त्या दोघांचा ऑटोग्राफ माझ्या मनःपटलावर नकळत उमटला होता.

  निस्वार्थ पणे आपले आयुष्य दुलर्क्षित असलेल्या घटकांसाठी झोकून द्यायला, जंगलात जाउन डॉक्टरी करणारे  आशिष- कविता हे महान आरोग्यदूत आहेत. मी तर म्हणेन वंचित घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडायला पृथ्वीतलावर आलेले ते तर देवदूतच !

No comments:

Post a Comment